

विचारांचा पाऊस
नाही आज नको.
कवी बनायची खाज नको.
पण आज काही खास आहे
पावसाची सुरू रास आहे.
करतो शब्दांवर थोडा संस्कार,
आणि मांडतो भिजलेल्या मनाचे विचार.
खूप वाट बघितली, अरे होतास कुठे वरुण,
धरणं नद्या वाट पहाती, घसा कोरडा करून.
आता आला आहेस, असू दे काही महिने मुक्काम,
तुझ्या विना बघ राजा, आमचं होणार नाही काम.
रागावला असशील, म्हणून उशीर केलास,
आमच्या चुकीचा धडा, आम्हाला शिकवलास.
पण करू काय नेमकं, हेच समजत नाही,
सगळे काही कळते, पण का वळत नाही?
पाणी वाचवायचं होतं, झाडे ही लावयाची होती,
सवयी बदलायच्या होत्या, बदल घडवायचा होता,
पण वर्ष निघून जातात, असंच बघता बघता.
ह्या वर्षी नक्की, करतो आम्ही सुधार,
बस एक वर्ष दे अजून, तुझा विश्वास उधार.
सुरवात स्वतःहून करतो, नको कोणाची साथ,
एवढाच बदल केला तरी, बदल दिसेल साक्षात.
तू पुन्हा असं करू नको, आम्हावर राग धरू नको,
बिचाऱ्या शेतकऱ्याची पण, होत अशांनी नड,
म्हणून तू वरुण राजा, वरून वेळेत धबा धबा पड.
